Sunday 7 June 2020

पृथ्विराजरासो काव्यातील पोस्टच्या निमित्ताने...

चंद बरदाई या पृथ्वीराज चौहानाच्या भाटाने पृथ्वीराजाच्या मृत्यूनंतर पृथ्वीराजरासो नावाचं काव्य रचलं. या काव्यात त्याने पृथ्वीराजाला काव्यगत न्याय देण्यासाठी उपरोल्लेखित प्रसंग रचला. इतिहासाच्या कसोटीवर तो सत्य ठरत नाही पण पराभूत मनाला सावरायला मदत करतो. त्याचं तितकंच प्रयोजन! पृथ्विराजाकडे असलेलं शब्दवेधी बाण मारण्याचं कौशल्य आणि त्याआधारे त्याने महंमद घोरीचा केलेला वध, हा या काव्यातील प्रसंग, सध्या कायप्पावर फिरतोय आणि काही लोकं तो सत्य मानतायत. यासंबंधी मनात आलेले विचार इथे उधृत करतोय - 

चंद बरदाईच्या पृथ्विराजरासोमधल्या या प्रसंगात अडचण ही वाटते की अशा काव्यगत न्यायातून युद्धातल्या पराभवानंतर वाटेला आलेल्या परिणामांची योग्य चिकित्सा होत नाही. स्वतःच्या मूर्खपणामुळे पत्कराव्या लागलेल्या मृत्यूला गौरवल्यामुळे केलेल्या मूर्खपणावर पडदा पडतो. माझ्या मते हेच टाळणं आवश्यक असतं.

पहिल्या वेळी पराभव झाल्यानंतर क्षमा करून सोडून दिलेला महंमद घोरी पुन्हा सैन्य घेऊन येतो हे बघताच पृथ्वीराजाने त्याला क्षमेसाठी नालायक ठरवून दुस-या वेळच्या पराभवानंतर आततायी ठरवून त्याचा वध करणं अपेक्षित होतं. त्याऐवजी पृथ्वीराज घोरीला सोळा वेळा क्षमा करत असेल तर ती त्याची सद्गुणविकृतीच होती. कल्पना करा, सोळा वेळा पराभवाच्या अपमानात होरपळलेल्या घोरीला जेव्हा सतराव्या प्रयत्नात पृथ्वीराजाचा पराभव करता आला तेव्हा त्याने मारूनच टाकलंय, कारण हाती आलेल्या शत्रूला क्षमा केल्यावर तो कसा उलटू शकतो, हे त्याने स्वतःच्या उदाहरणातूनच पाहिलंय. त्याने पृथ्वीराजाने केलेली चूक स्वतः करण्याचा विचारही केलेला नाही. पण ही क्षमा करण्याची, अभयदानाची सद्गुणविकृती आपण पुढेही दर्शवतंच राहिलो. मग ते प्रतापराव गुजर असो किंवा महात्मा गांधी. 

इतिहासातून योग्य तो धडा न घेता आपण या सद्गुणविकृतीने आपलाच घात करून घेत आहोत, हेच वास्तव आहे.

No comments:

Post a Comment