Friday 19 June 2020

पाणी पिणे - आयुर्वेदिक दृष्टीकोन

आयुर्वेदामध्ये आहाराच्या अनुषंगाने पाणी पिण्याबद्दलही काही निश्चित मार्गदर्शन केलं आहे. पाणी ही शरीराला आवश्यक गोष्ट आहे कारण आपलं शरीर हे पाण्यातच निर्माण झालेलं आहे, पाण्यावरच पोसलेलं आहे. शरीरात सुमारे 70% जलीय घटकच आहेत. असं असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अन्नाप्रमाणे पाणीही तितकंच आवश्यक असतं.

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम् |
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषापहम् ||

अजीर्णासारख्या अग्नी आणि अन्नाच्या अपचनाशी संबंधीत व्याधीमध्ये सामान्य अन्नग्रहण हे अयोग्य असताना, पाणी हाच शरीराचा आधार होतो. त्यामुळे अशा अवस्थांमध्ये पाणी हे औषधाप्रमाणे आरोग्यकारी होऊन उपयोगी पडतं. 

आपण ग्रहण केलेल्या आहाराचं पचन झाल्यावर व्यवस्थित पाणी प्यावं. त्यामुळे शरीराच्या जलविषयक गरजा पूर्ण होतात आणि शरीर बलवान होतं.

अन्नपचनाची प्रक्रिया सुरू असताना म्हणजे जेवणानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी प्याल्यास पाचक-अग्नीवर परिणाम होऊन पचनप्रक्रियेमध्ये अडथळा येतो. त्यातून अन्नपचन आणि पर्यायाने शरीर-पोषण व्यवस्थित होत नाही. आहारापासून शरीरपोषक असा आहाररस बनण्याऐवजी आम हा विषासमान विकृत रस तयार होऊन शरीरात रोगनिर्मिती होऊ शकत असल्यामुळे जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिणे विषासमान मानले आहे.

आता प्रश्न असा पडतो की मग जेवताना पाणी केव्हा प्यावे, तर ते जेवणाच्या दरम्यान अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे दोन-तीन छोट्या घोटांच्या प्रमाणात घ्यावे. अशाप्रकारे प्यालेले पाणी हे अमृतासमान काम करते, असं मानलेलं आहे. जेवणाच्या दरम्यान अगदी थोडं थोडं गरमसर पाणी प्यायल्याने अन्नाचा जिभेवरील चिकटा दूर होतो. अन्नाची योग्य ती चव कळते, भूक वाढते, यामुळे जेवणादरम्यान थोडं थोडं पाणी पिणं योग्य मानलेलं दिसतं.

यावरून आपण पाणी केव्हा प्यावं, याबद्दल आपला आपण निर्णय घेऊ शकू...

No comments:

Post a Comment