Sunday 12 October 2014

तफावत

जेवणानंतर जडावलेलो. टळटळीत ऊन मी म्हणत होतं. ऑफीसच्या दिशेने जाणारा रस्ता उभाच्या उभा सुस्त अजगरागत पडलेला. म्हंटलं, गाडी मागवण्यापेक्षा आज अंगाला उन्हं द्यावं. तसाच चालू लागलो. रस्त्याला लागलो तर लक्षात आलं, दुतर्फा झाडीही कमीच झालीयेत. बिनरहदारीच्या रस्त्यावर आता आरामात चालू लागलो तर दिसलं, लांबवरच्या एकमात्र काहीशा डेरेदार वडाखाली सावलीला तिघजणं बसलीयेत, बुवा, बाई नि बहुतेक त्यांचं लहानसर लेकरू. आणखी पुढे जाईतो चित्र जास्त स्पष्ट झालं. तिघेही सावलीलाच बसलेले. मी लांबवरचे हिरवट नीळे डोंगर, आजुबाजूची फुटकळ झाडी नि भाताची पिवळट शेतं बघत त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मला कळलं, त्यांचंही माझ्याकडे लक्ष होतं. तिघांनी बरीच दलमजल केल्याचं कळत होतं. मी जवळ पोहोचताच मळकट सदर्‍याच्या बुवानं तसल्याच रंगाची गांधी टोपी डोक्यावर चढवून लेकराला खूण केली नि ते लेकरू सावलीखालून उठून बापासंगत चालू लागलं. त्यासरशी रस्त्याच्या टोकाशी सावलीत बसलेल्या ठसठशीत कुंकू लावलेल्या नि तसल्याच रंगाची साडी नेसलेल्या त्याच्या आईने उठून बुडाखालच्या बर्‍यापैकी झिजलेल्या प्लॅस्टीकच्या चपल्या चढवल्या आणि तीही त्यांच्या मागोमाग चालती झाली. जणू मी त्यांच्यापर्यंत येईतो विश्रांती घेऊ असं आधीच ठरलेलं. अंतर बरच कापायचं असावं बहुतेक, आधी तिठ्यापर्यंत आणि नंतर पुढेही, मिळालं तर वाहन नाही तर पुन्हा पायीच. मजेखातर उन्हात घाम गाळणारा मी, रस्ते, सरकारी बसेस् किंवा इतर वाहनं अजूनही न पोचलेली गावं, तिथल्या गावकर्‍यांचं गरीबीतलं जीवन, खर्चाच्या हातमिळवणीसाठी त्यांना करावे लागणारे कष्ट असा काहीबाही विचार करतोय तोच मागून एक चारचाकी सर्राट् करून पुढे गेली. दिसलं, त्यातही आई-बाप-लेकरू असं तिघांचंच एक कुटूंब आहे.....

No comments:

Post a Comment