Tuesday 20 December 2011

खवय्यांची सोय - १

"आज जग हे 'ग्लोबल व्हिलेज' झालेलं आहे", असं एक पेटंट वाक्य सध्या सगळीकडेच ऐकू येतंय. जगाचं माहित नाही पण दळणवळणातल्या क्रान्तिमुळे महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतात गावोगावी एकमेकांशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. किंबहुना मुंबईपुरता विचार केला तर महाराष्ट्रच नाही तर अख्खा भारत मुंबईशी जोडला गेला आहे. कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने कानाकोपर्‍यातून माणसं मुंबईत येतात, दोन-चार दिवस राहतात, आपली कामं उरकतात आणि परततात. राहण्याची सोय कुठेही होऊ शकते पण अडचण नेहमीच खाण्याची होते असं मला वाटतं. आपल्याला साजेहा, आवडणारा आहार आपल्याला कुठे मिळेल हे कुणी आधी सांगितल्याशिवाय अचानक आपल्याला कळूच शकत नाही. म्हणून म्हंटलं, आपल्या जगभरातील मित्रांसाठी इथे माझ्या आवडत्या काही ठिकाणांची माहिती देऊ या!

मी जन्मापासून निरामिष आहार ग्रहण करणारा आणि त्यामुळे माझ्या आवडीही तशाच तेव्हा त्याच प्रकारच्या खानावळीची माहिती तुमच्याबरोबर वाटतोय. या जागेची माहिती कदाचित अनेकांना आधीच असेल पण तरीही पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

मी प्रामुख्याने मुंबई इथे आहे आणि माझ्या लहानपणी ४-६ महिन्यातून एकदा हॉटेलिंगसाठी घराबाहेर जेवायचे प्रसंग यायचे. त्यातही माझ्या खाण्याचे प्रमाण पाहून माझ्या घरच्यांनी घरच्या घरीच माझी सोय लावणे किती उपयुक्त ठरते ते खूप आधीच जाणले होते. असं असतानाही अनेक वर्षांपूर्वी काही कारणाने एका खानावळीत जाण्याचा योग आला. त्याकाळी बाहेर खायचं म्हणजे उडप्याकडेच खायचं असंच असायचं आणि एकूणच एक डोसा, २ इडल्या एवढ्याने माझी भूक कधीच शमायची नाही नि माझा तिथेच त्रागा सुरु व्हायचा. तरीही या उडप्याकडेच जाऊया असं तीर्थरूपांचं म्हणण पडलं आणि अस्मादिक तिथे स्थानापन्न झालो. जरा घुश्श्यातच असल्याने आजूबाजूला न बघता मी तडक दिसेल त्या पहिल्या खुर्चीत मान खाली घालून बसलो.

आजूबाजूला प्रचंड गडबड उडालेली आणि अनेक मुले इकडे तिकडे फिरत होती पण मी मात्र मान वर करून कुठे बघतच नव्हतो. मला या उडप्याकडे घेऊन येण्याबद्दल वडिलांवर चिडून मी तसाच फुरगंटून बसलेलो असताना माझ्यासमोर मोठ्ठ केळीच पान अंथरलं गेलं. मुंजीचं जेवण तेव्हढ केळीच्या पानावर जेवलेल्या मला ते अचंबित करणारं होतं. तेव्हा पहिल्यांदा आजूबाजूला बघितल्यावर सगळ्यांच्याच समोर वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं केळीच्या पानाचं ताट दिसलं. वडिलांनी हसून माझ्या पानावर पाणी ओतलं आणि ते पुन्हा एकदा धुतलं. मला हे सारं नवीन होतं. अचानक त्या स्वच्छ पानावर मीठ, लोणचं, तीन प्रकारच्या भाज्या, रस्सम, सांबार, दही, ताक आणि पापड या व्यंजनांनी आपापलं स्थान ग्रहण केलं. एक वाटी पायसम (खीर) ची आली नि पुढच्याच क्षणाला छान तूप लावलेली गरम गरम पोळी माझ्या ताटात पडली आणि माझा राग कुठल्याकुठे विरघळून गेला. हव्या असतील तर तिथे
टमटमीत  फुगलेल्या पुर्‍याही उपलब्ध होत्या. माझ्या चेहर्‍यावर "अजि म्या ब्रह्म पाहिले"से भाव उमटले असावेत कारण वडील माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसून म्हणाले काळजी करू नकोस ही अमर्यादित भोजन थाळी आहे. 

या घटनेला आज २५ वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे पण माझ्या आठवणीतली ही खानावळ अजूनही तशीच आहे. तसंच केळीचं पान, तसेच रस्सम - सांबार, तशाच भाज्या, गरम गरम पोळ्या नि भात आणि त्याच क्वालिटीचा पापड..... आता गोडाचा पदार्थ मात्र एकदाच मिळतो किंवा अतिरिक्त पैसे देऊन घ्यावा लागतो.

तेव्हा मित्रानो, असा तृप्तीदायक अनुभव घ्यायचा असेल तर जरूर भेट द्या -
"रामा नायक यांचे उडुपी श्री कृष्ण बोर्डिंग हाऊस"
माटुंगा (सेन्ट्रल) स्टेशन समोर, माटुंगा (पूर्व), मुंबई.

स्टेशन समोरच्या या इमारतीत शिरताच स्वच्छता राखल्याचे दिसते. भिंतींवर गीता - गीताई चे श्लोक लिहिलेले आढळतात. मराठी, कोकणी आणि कानडी मुले आपापली नेमून दिलेली कामे झटपट करताना दिसतात. खूप गर्दी - गोंधळातही बर्‍यापैकी सौजन्याने व्यवहार होतो.


इथे मर्यादित थाळी - रु. ४५/- (अधिक तुम्हाला हवी असल्यास एक्स्ट्रा व्यंजने त्यांच्या किमती प्रमाणे) आणि अमर्यादित थाळी - रु. १२०/- अशा आपल्याला परवडणार्‍या दरात अप्रतिम तृप्ती होते. 

टीप -
  • छायाचित्रे आंतरजालावरून साभार
  • उडुपी श्रीकृष्ण बोर्डिंग व्यवस्थापनाने दरांमध्ये बदल केला असू शकतो.
  • ही जाहिरात नाही. 

1 comment:

  1. Sundar, "Prakash" hya hotel cha hi asa kahi lihavas. Atul is a fan of this restaurant and never misses the opportunity to visit it whenever he is in Dadar.

    ReplyDelete