Friday 18 November 2011

अथातो प्राकृत जिज्ञासा। - ५


आता इंद्राने निश्चित केलेली भाषा हीच प्रकृति मानावी या माझ्या मताकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो. माझ्या या म्हणण्याला आधार देण्याच्या दृष्टीने काही विवेचन करण्याचा प्रयत्न करतो.
भाषिक दृष्टीने संस्कृत आणि प्राकृत यांचं पौर्वापर्य हा नेहमीच वादाचा विषय झालेला आहे. कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा तुलनात्मक अभ्यास केला जातो तेव्हा त्यातील शब्दांचं वर्गीकरण तीन प्रकारे केलं जातं. हे तीन प्रकार आहेत
१. तत्सम 
२. तद्भव आणि 
३. देश्य
१. तत्सम शब्द म्हणजे सामान्यतः जे दोन्ही भाषांमध्ये सारखेच असतात.
२. तद्भव म्हणजे सामान्यतः एका भाषेतून दुसर्‍या भाषेत गेलेले आणि त्या दरम्यान त्यांच्यात काही बदल झालेले. यामध्ये बहुदा एका भाषेतल्या त्या शब्दाचा मूळ दुसर्‍या भाषेतला शब्द ओळखणं सहज शक्य होतं.
३. देश्य म्हणजे सामान्यतः एकाच भाषेत असलेले पण दुसर्‍या भाषेत न सापडणारे.
तत्सम आणि तद्भव हे दोन्ही शब्द प्रकार सहज समजू शकतात. अडचण होते ती या देश्य शब्दांच्या बाबतीत. हे शब्द (नामे आणि धातु) यांना आदेश होऊन (नवं अक्षर वा शब्द जोडला जाऊन) तयार झालेले असतात असं साधारणपणे लक्षात येतं. प्राकृताच्या बाबतीत हे देश्य शब्द मूळ संस्कृत नाम आणि धातुंना आदेश लागून तयार झालेले आहेत असं सांगतात. या मतानुसार कोणत्याही भाषेचे या मार्गाने सुलभीकरण करून भाषा सोपी करण्याकडे मानवांची प्रवृत्ती असते असं प्रतिपादन केलं जातं. म्हणूनच संस्कृतचं सुलभीकरण होऊन प्राकृत झाल्याचं सांगितलं जातं. पण हे पूर्णसत्य नाही कारण देश्य शब्दांच्या बाबतीत हे समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही.
प्राकृत भाषेतील देश्य शब्दांची विपुल संख्या हे प्राकृताच्या अबंदिस्तपणाचे लक्षण आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येतं हे माझं वैयक्तिक मत आहे. देश्य हा शब्दच जो अर्थ दाखवतो त्याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं. देश्य म्हणजे देशविशिष्ट. ज्या देशामध्ये म्हणजे परिसरामधल्या मानव-समूहामध्ये एखादी भाषा बोलली जाते, त्या स्थानाशी आणि तिथल्या परिस्थितीशी निगडीत नवीन शब्दांची भर त्या भाषेत नेहमीच पडत असते. बोली भाषा स्वरूपामध्ये असे अनेक शब्द भाषांमध्ये दाखल होत जातात तसेच अनेक शब्द भाषेतून न वापरण्याने बाहेर काढले जात असतात. देश्य शब्दांचं आवागमन भाषेच्या प्रवाहीपणाचं लक्षण आहे. असं असल्यामुळे देश्य शब्द संस्कृत नाम-धातुंना आदेश होऊन बनण्याने ते संस्कृतोद्भव होत नाहीत आणि प्रत्येक देश्य शब्दाचं संस्कृतोद्भव शब्द म्हणून स्पष्टीकरण मिळत नसल्याने तो त्या प्राकृतातला मूळ शब्द बनत नाही जो संस्कृत भाषेच्या उद्भवापूर्वीही असेलच कारण तो तितका प्राचीन आहेच असं आपल्याला नेहमीच म्हणता येत नाही. देश्य शब्दांची निर्मिती ही एक सतत विकसित होणारी प्रक्रिया असल्यामुळे तिचा पौर्वापर्याशी संबंध लावणं अनावश्यक होईल असंच मला वाटतं.
या विवेचनानंतर संस्कृत-प्राकृत संबंधाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न अनुत्तरितंच राहतो. त्यामुळे याचं उत्तर शोधण्यासाठी अपल्याला पुन्हा एकदा अतिप्राचीन अशा वेद वाङ्मयाकडेच जावं लागतं. वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासकांचं असं मत आहे की मूळ वेदातल्या ऋचांमध्ये जी भाषा वापरलेली आहे, तिच्यात आणि प्राकृतात बरेच साम्य आहे. या साम्याच्या अनुषंगानेही प्राकृत भाषा अभिजात संस्कृत भाषेच्या पूर्वीची मानली जाते. परंतु हे म्हणनं किती योग्य आहे त्याचा उहापोह करण्यापूर्वी ही साम्यस्थळे पहाण्याचा प्रयत्न करू या.
१. वैदिक संस्कृत भाषेमध्ये प्राकृताप्रमाणेच संयुक्त व्यंजनांमध्ये स्वर घुसवलेला आढळतो.
जसं स्वर्ग => सुवर्ग, तन्व => तनुव, त्र्यंबक => त्रियंबक
२. तृतिया बहुवचनाची रुपं - देवेभि: ऐवजी देवेहि, ज्येष्ठेभि: ऐवजी जेट्ठेहि
३. चतुर्थी वापरण्याऐवजी षष्ठी विभक्ति वापरणं
४. विभक्तिप्रत्ययाचा लोप करणं - उच्चात् => उच्चा, नीचात् => नीचा आश्विनौ => आश्विना
५. 'ळ' चा उपयोग प्राकृताप्रमाणेच वैदिक भाषेत केलेला आढळतो - दुर्दभ => दूळभ, ईडे => ईळे
त्याचप्रमाणे अनेक प्राकृत रुपांचा वापर वैदिक भाषेमध्ये दिसतो.
अशाप्रकारे अतिप्राचीन अशा वैदिक संस्कृताशी प्राकृताचं जे साम्य दिसतं आणि त्याच वेळेला अभिजात संस्कृताशी जे वेगळेपण दिसतं हेदेखिल समजून घेणं गरजेचं आहे.
या संदर्भात वैदिक संस्कृत हे यजुर्वेदोक्त इंद्राने व्याकृत केलेल्या भाषेच्या, ज्याला यापूर्वी आपण 'प्रकृति' या नावाने संबोधलेलं आहे, तिच्या सर्वात जवळचं आहे. ही भाषा अभिजात संस्कृत, जी सध्या पाणिनीच्या व्याकरणाने बांधली आहे, ती नाहीच आहे. यामुळेच वैदिक संस्कृतचे व्याकरण निराळे शिकावे लागते. या व्याकरणाचा वापर केवळ वेदांमधलं संस्कृत समजून घेण्याकरिता होतो. त्यावरून कोणतेही नवे साहित्य निर्माण होत नाही कारण त्यासाठी पाणिनीय संस्कृत उपलब्ध आहेच की! एकदा का सद्य कालीन अभिजात संस्कृत आणि वैदिक संस्कृत निराळं झालं की प्राकृताचं वैदिक भाषेशी असलेलं साम्य, आपण आधी उल्लेखलेल्या 'प्रकृति' भाषेवरून सहजच स्पष्ट होतं.
अभिजातत्वाच्या कारणाने पाणिनी-पतंजलि आदिंच्या व्याकरणाद्वारे संस्कृत अधिकाधिक बंदिस्त झाली आणि त्यातही संस्कृत भाषेला जे धार्मिक महत्त्व मिळालं त्यामुळे ती पवित्र भाषा बनली. यामुळेच ती जशी आहे तशी जतन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिणामी तिच्यामधलं प्रवाहीपण संपुष्टात आलं. या उलट प्रकृति भाषा प्रवाही राहिली. त्यामुळे तिच्यामध्ये देश भेदाने नव्या शब्दांची भर होत राहिली आणि भारतातील वेगवेगळ्या स्थानानुसार महाराष्ट्री, शौरसेनि आणि मागधी अशा भाषांचा विकास झाला. पुढे याच भाषांपासून अर्वाचीन मराठी, हिन्दी, कन्नड अशा भाषा निर्माण झाल्या.
म्हणूनच आपल्याला असं म्हणता येतं की मूळ प्रकृति भाषेपासून वैदिक भाषा, वैदिक भाषेचे दोन विभाग, एक सद्य अभिजात संस्कृत आणि दुसरा जनसामान्यांच्या प्रकृति भाषेतून उद्भवणार्‍या प्राकृत भाषा. अभिजात संस्कृत व्याकरणबद्ध होऊन बंदिस्त भाषा बनली तर प्राकृत भाषा प्रवाहीपणामुळे सतत विकसित होत राहिल्या आणि म्हणूनच त्यांच्यातून पुढे आजच्या भारतीय भाषा उत्पन्न होऊ शकल्या.
या एकंदर विवेचनावरून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की संस्कृत आणि प्राकृत या दोघी प्रकृति भाषेपासून उत्पन्न झालेल्या सख्ख्या बहिणी आहेत आणि त्यांच्यापैकी प्राकृत भाषेचा प्रवाहीपणा टिकल्यामुळे वंशविस्तार होऊन आजच्या भारतीय भाषांची निर्मिती झाली तर संस्कृत अधिकाधिक बंदिस्तपणामुळे आपली सृजनशीलता वठवून बसली.
प्राकृत भाषेबद्दल जाणून घेण्यापूर्वी वरील प्रकारे प्रकृती भाषेचं निश्चितीकरण केल्यावर कोणत्याही उच्च-नीच अभिनिवेशाशिवाय आपण विविध प्राकृत भाषांचा आस्वाद घेण्यास मोकळे होतो.

No comments:

Post a Comment