Monday 28 November 2011

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

माझे आं. जा. मित्र श्री. यशवंतराव कुलकर्णी यांनी मिसळपाव या मराठी संस्थळावर तत्त्वज्ञ यु. जी. कृष्णमूर्ती यांच्या मतांवर आधारीत लेख लिहिला होता. यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत या लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं. तसं ते त्या धाग्यामध्ये प्रतिसादाच्या स्वरूपात करता आलं असतं पण त्यातील विचारांचं आणि लिखाणाचं बृहत्त्व पहाता नवा लेख लिहिणच गरजेचं वाटलं म्हणून हा प्रपंच.

यकुशेठांच्या लेखनातले मुद्दे मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे, ते पुढील प्रमाणे -
  • युजींच्या तथाकथित रुपांतरणोत्तर आयुष्यातली एक जाणीव म्हणजे त्यांचा भाषाविचार. सदर भाषाविचार हा त्यांच्या उपरोल्लेखित लेखाचा विषय आहे.
  • भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.
  • संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.
  • व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.
  • अशा अभिनिवेशांद्वारे जीवित झालेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांनी बनलेल्या भाषांमुळे एका ठराविक अभिव्यक्तीचे बंधन पडते.
  • असं असल्यामुळे सदर शब्दरुपी भाषा सर्वश्रेष्ठ सत्य उलगडून सांगण्यास (लेखानुसार आणि स्वतः युजींच्या म्हणण्यानुसार त्यांचे जगाबद्दलचे मत व्यक्त करण्यात) अपुरी पडते.
  • मग त्यांना असं जाणवतं की चिह्नरूपी भाषेतल्या शब्दांची त्यांना काहीच आवश्यकता नसावी म्हणून युजी या माध्यमावर अवलंबून रहात नाहीत.
  • तरीही त्यांच्या अनुयायांशी होणारा संवाद शब्द-भाषेच्या मार्फतच व्हावा लागतो. त्यामुळे त्या संवादात योजलेल्या शब्दांचा त्यांची मानसिक अवस्था समजण्यापुरताच उपयोग व्हावा अशी त्यांची धारणा आहे किंवा तसाच तो होतो असं त्यांचं मत आहे.
  • आयुष्यभरात या चिह्नरूपी भाषेच्या विळख्यात राहिल्याने आपण जग जाणू शकत नाही तर त्याऐवजी या चिह्ननिर्देशित प्रतिमांच्या घोटाळ्यात फसतो.
  • जेव्हा या चिह्नांनी दर्शवलेल्या प्रतिमांच्या जंजाळातून सुटू म्हणजे भाषा --> शब्द --> चिह्न --> प्रतिमा --> असत्य ही साखळी तोडू तेव्हा आपल्याला सत्याचं म्हणजेच युंजींच्या मताने आपल्या आजुबाजुच्या जगताचं दर्शन होईल.
आता वरील जंत्रीमध्ये जे विवेचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचा विचार करण्यापूर्वी खुद्द युजींबद्दल चार शब्द सांगणं आवश्यक होईल असं मला वाटतं.

यु. जी. तथा उप्पलुरी गोपाल कृष्णमूर्तींचा जन्म मच्छलीपट्टणम् (आन्ध्र प्रदेश) मध्ये १९१८ साली आणि त्यांचा मृत्यु २००७ साली इटली इथे झाला. तत्त्वज्ञान, अध्यात्माची आवड असणारे युजी अनेक वर्ष अनेक योगी आणि तत्त्वज्ञानी लोकांशी संबंधित राहिले. त्यांचे आजोबा थिऑसॉफिस्ट असल्याने त्यांचा तिथे ओढा होता आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या मदतीसाठी ऐन विशीत त्यांनी युरोपात लेक्चर्स दिली होती. पुढे युजी रमण महर्षी आणि जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात आले. दोन्हीकडे त्यांचं समाधान झालं नाही. दरम्यान जे. कृष्णमूर्तींशी विसंवाद होऊन ते तिथून बाहेर पडले. त्यानंतर काही वर्ष ते आपल्या थोरल्या मुलाच्या उपचारांसाठी अमेरीकेत राहिले. याच वेळेला त्यांनी आपल्या कुटुंबापासून फारकत घेतली आणि स्वतः इंग्लंडमध्ये आणि नंतर पॅरीसला जाऊन राहिले. तिथे त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची झाल्यामुळे तिथून ते जिनीवाला गेले. तिथे त्यांनी भारतीय वकिलातीत जाऊन त्यांना भारतात पाठवण्याची विनंती केली. वकिलातीने त्यांच्या परत पाठवणीसाठी खर्च करण्याचं नाकारलं. तेव्हा भारतीय वकिलातीमधल्या व्हॅलेंटिना नावाच्या साठीच्या महिलेने त्यांना आसरा दिला आणि युजींना स्विट्झर्लंडमध्ये घर मिळालं. एकूण या दरम्यान युजींची शारीरिक आणि मानसिक बरीच आबाळ झाली. दरम्यान त्यांचे शक्य त्या मार्गाने अध्यात्मिक साधनेचे प्रयत्न सुरूच होते. याच काळात तिथे लेक्चर्स देण्यासाठी आलेल्या जे. कृष्णमूर्तींशी पुन्हा संपर्क होऊन संवादाला सुरूवात झाली पण थोड्याच दिवसात युजींचा जे. कृष्णमूर्तींकडून भ्रमनिरास होऊन ते पुन्हा वेगळे झाले.

या काळातच युजींना तथाकथित शारीरिक आणि मानसिक रुपांतरणाचा अनुभव आला. त्यांनी स्वतः या अनुभवाचं वर्णन असं केलेलं आहे (संदर्भः विकीपेडिया) -
I call it calamity because from the point of view of one who thinks this is something fantastic, blissful and full of beatitude, love, or ecstasy, this is physical torture; this is a calamity from that point of view. Not a calamity to me but a calamity to those who have an image that something marvelous is going to happen.
Upon the eighth day:
Then, on the eighth day I was sitting on the sofa and suddenly there was an outburst of tremendous energy – tremendous energy shaking the whole body, and along with the body, the sofa, the chalet and the whole universe, as it were – shaking, vibrating. You can't create that movement at all. It was sudden. Whether it was coming from outside or inside, from below or above, I don't know – I couldn't locate the spot; it was all over. It lasted for hours and hours. I couldn't bear it but there was nothing I could do to stop it; there was a total helplessness. This went on and on, day after day, day after day.
The energy that is operating there does not feel the limitations of the body; it is not interested; it has its own momentum. It is a very painful thing. It is not that ecstatic, blissful beatitude and all that rubbish – stuff and nonsense! – it is really a painful thing.

या अनुभवानंतर त्यांनी स्वतःचं तत्त्वज्ञान मांडायला सुरूवात केली. त्यांचं तत्त्व त्यांच्याच शब्दात होतं, "Tell them that there is nothing to understand." (सांगा त्यांना की इथे काहीही जाणण्यासारखं नाही.) - सं. - विकीपेडिया

त्यांचं सदर तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या काही व्यक्तींना ते ज्ञानी वाटत तर काहींना पाखंडी पण लवकरच त्यांच्या या 'अगम्य' तत्त्वज्ञानाबद्दल पुस्तकं लिहिली गेली, त्यांची विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली आणि ते एकूणच प्रसिद्धीस पावले.

युजींबद्दलची माहिती सगळ्यांना असणं शक्य नाही म्हणून इथे आधी सांगितली.

योग आणि ध्यान करणार्‍यांच्या साधनेमध्ये त्रुटी किंवा चूक घडल्यास त्याचे परिणाम त्यांच्या मनाला भोगावे लागतात असं योगशास्त्रात सांगितलं जातं. हे परिणाम क्लेश स्वरूपात त्यांचे मन त्रिगुणांपैकी (सत्त्व-रज-तम) ज्या गुणाच्या अधिपत्याखाली असेल त्यानुसार घडून येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश होत. पातंजल योगसूत्रांमध्येही या क्लेशांना अविद्याजन्य मानलेलं आहे. हे इथे सांगण्याचं कारण इतकंच की असाच काहीसा प्रकार युजींच्या बाबतीत घडला असावा आणि त्यालाच त्यांनी त्यांना स्वतःला अनुभवाला आलेलं 'रुपांतरण' असं मानलं असावं. यासाठी किती काळ लागतो वगैरे सूत्रांमध्ये दिलेलं नाही पण युजींची ही अवस्था आठ दिवस होती असं त्यांच्या शब्दांतूनच कळतं. युजींच्या भ्रमित अवस्थेला सुरूवात झाली ती इथेच असं मला वाटतं. मात्र त्यांनी स्वतः मात्र या अनुभवाला एका विशिष्ट जाणीवेचं स्वरूप मानलं आणि नंतर त्या जाणीवेलाच नाकारलं. गौतम बुद्धापासून इतर तत्त्वज्ञानींना जे सर्वश्रेष्ठ सत्याचं ज्ञान झालं त्याचा शोध घेणार्‍या युजींनी त्याच सत्याला नाकारलं, त्याच्या ज्ञानाला नाकारलं इतकंच काय तर त्यांनी व्यक्त झालेल्या प्रत्येक गोष्टीला नाकारलं. या नकाराचाच एक भाग म्हणजे यशवंतरावांनी मांडलेला त्यांचा भाषा-विचार.

युजींचं हे सगळं तत्त्वज्ञानच कसा एक भ्रम आहे हेच आता आपल्याला समजून घ्यायचं आहे.

युजी म्हणतात -

भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो.
संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही.
व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.

अशा अभिनिवेशांद्वारे जीवित झालेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांनी बनलेल्या भाषांमुळे एका ठराविक अभिव्यक्तीचे बंधन पडते.

हे सगळ म्हणत असताना युजी विसरतात की भाषा हे केवळ संवादाचंच माध्यम नाही तर ते ज्ञानाचंही माध्यम आहे. आता कुणी म्हणेल की त्यांनी ज्ञानच नाकारलंय तर हे माध्यमही नाकारणारच ना! पण त्याच वेळेला ते त्यांच्या मनाची अवस्था अनुयायांना समजावी म्हणून त्याच भाषेचा उपयोग करतात म्हणजे हा वदतोव्यघातच म्हणायला हवा. त्यांच्या अनुयायांना त्यांच्या मनाची अवस्था समजते म्हणजेच युजींच्या मनाच्या अवस्थेचं ज्ञान होतं म्हणजेच ते ज्या ज्ञानाला नाकारत आहेत त्याचंच अस्तित्व इथे त्याच वेळेला मान्यही करत आहेत. हे त्यांच्या भ्रमाचेच द्योतक होईल.

या शिवाय त्यांनी भाषा ही चिह्नयुक्त वा प्रतिमास्वरूप मानली आहे. भाषा मुळात दोन प्रकारची आहे. बोली भाषा आणि लिखित भाषा. बोली भाषेत स्वर आणि व्यंजनं येतात तर लिखित भाषेत त्यांना विशिष्ट चिह्नं. युजी जेव्हा भाषेला प्रतिमा वा चिह्नयुक्त म्हणतात तेव्हा त्यांचा रोख लेखी भाषेतील चिह्नांकडे आहे असंच जाणवतं. त्याचप्रमाणे ते जेव्हा भाषेला जगाची प्रतिमा मानतात (मुळात हा विचारच किती निरर्थक आहे? तुम्ही जगालाच नाकारता मग त्याची ही प्रतिमा कुठून पैदाकरता?) आणि त्या भाषेच्या शब्दांच्या अक्षरांना संकुचित वापरामुळे तुकड्या तुकड्याने अभिव्यक्त मानतात तेव्हा त्यांचा उपरोल्लेखित वैचारिक भ्रम अधिक स्पष्टपणे दिसतो. कारण एकदाका तुम्ही ज्ञान नाकारलंत, जाणीव नाकारलीत, सत्य नाकारलंत की मग ही शाब्दिक अभिव्यक्ती काय चीज आहे? "जगात काहीही जाणण्यासारखं नाही, जे काही आहे ते केवळ काही असंबद्ध वाक्यं आहेत, ज्यांची संगती तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता," अशा वाक्यांमधून (सं - विकी) युजींची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते असं मला वाटतं कारण एका बाजूला ते ज्या ज्या गोष्टींचं अस्तित्त्व नाकारतात त्या त्या गोष्टी ते दुसर्‍या अंगाने (इनडायरेक्टली) मान्य करतात. मग त्यांनी सांगितलेलं तथाकथित तत्त्वज्ञान केवळ त्यांनी त्याज्य मानलेल्या भाषेतील शाब्दिक बुडबुडेच होतात. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. ऐकणार्‍याला हातात काहीच मिळत नाही. वेळ मात्र फुकट जातो.

मात्र असं असूनही युजी अंगाला काहीच लाऊन घेत नाहीत. त्यांनी ज्ञानालाच नाकारलेलं असल्याने ते कोणतं तरी ज्ञान देत आहेत असं ते स्वतःच मानत नाहीत पण त्याचवेळेला ऐकणार्‍याला त्यांच्या विधानांची संगती लावण्याच्या दृष्टीने त्यांच्या मते मृत भाषेतील शब्दांचे बुडबुडे ते सोडतच असतात मात्र हे बुडबुडे त्यांची मानसिक अवस्था समजावी म्हणूनच असतात, हे एक गौडबंगालच आहे.

करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे. युजी स्वतः सांगतात की मी सगळं नाकारतोय पण लोकंच त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांच्या (युजींच्या) असंगत वाक्यांतून अर्थ काढत बसतात आणि अखेर काहीच हातात न मिळाल्याने निराश होतात. युजींच्या वक्तव्यांचा विचार करता ते त्यांना प्रश्न विचारणार्‍याचा प्रत्येक मुद्दा नाकारतात. प्रश्नकर्ता कोणत्यातरी अडचणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याच्या अडचणी व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांनाच नाकारतात. नंतर त्याच्या अडचणींनाच नाकारतात. पुढे त्या व्यक्तीच्या जाणीवांनाच नाकारतात आणि अशा प्रकारे आपल्या अडचणींचा सामना करताना मेटाकुटीला आलेला जिज्ञासू अधिकच संभ्रमात पडतो आणि त्यांच्या नकारात गूढ अर्थ शोधू लागतो. यातच पुढे अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचा विचार काहीही निष्पन्न करत नाही आणि असे असंबद्ध नि 'गूढ' विचार व्यक्त करण्यासाठी युजींसारखं रुपांतरणही आवश्यक नसतं. आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात. भांग खाऊन व्यक्त केलेले नसले तरी युजींचे विचार तसाच एक कल्पनाविलास वाटतो.

खरं तर युजींच्या या तथाकथित तत्त्वज्ञानाचं (पुन्हा वदतोव्यघात) वेगवेगळ्या प्रकारे खंडन करता येणं शक्य आहे. अनेक संदर्भ आणि शास्त्रवचनं यासाठी देता येतील पण ज्यांनी स्वतः तत्त्वज्ञानाचा पाया असलेलं शाश्वत सत्य नाकारलं, त्या सत्याचं ज्ञान नाकारलं, त्या सत्याच्या ज्ञानाचं साधन नाकारलं आणि जग तथा जीवनासंदर्भात कुठल्याही तर्‍हेची साध्यं नाकारली अशा व्यक्तीला फक्त 'नाकारून'च त्याच्या मतांचं खंडण करणं मला अधिक योग्य वाटतं.

1 comment:

  1. I feel the same about Osho, too... dont know how many people will agree with me, but I feel "rejection" was base for Osho's theory, too..

    ReplyDelete